बुध बीट शिष्यवृत्ती पॅटर्न

पार्श्वभूमी :

जून २०११ मध्ये बुध बीटचे विस्तार अधिकारी म्हणून श्री मिसाळ साहेब यांनी कार्यभाग स्वीकारला बीटमधील शैक्षणिक वातावरण व शिक्षकांची शिष्यवृत्तीसाठीची तळमळ पाहून बुध बीट शिष्यवृत्ती पॅटर्नचा पाया घातला.

पूर्वतयारी :

बुध बीट मधील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती साठी पूर्वतयारीची सुरुवात एप्रिल महिन्यात केली जाते. पुढील शैक्षणिक वर्षासाठीचे नियोजन एप्रिल महिन्यातच केले जाते. यामध्ये वर्गशिक्षकांची बैठक घेऊन पुढील वर्षासाठीचे वार्षिक नियोजन सराव चाचण्या नियोजन विद्यार्थी निवड इ. बाबींचे नियोजन केले जाते.
माहे जून ते नोव्हेंबर अखेर अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर त्या त्या आठवड्यात स्पीड टेस्ट घेतली जाते. स्पीड टेस्टच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या उणीवांचा विचार करून त्यावर मार्गदर्शन केले जाते. अशा प्रकारे दीपावली सुट्टी अगोदर अभ्यासक्रम पूर्ण करून बीटमधील इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांची पहिली निवड चाचणी नोव्हेंबर दरम्यान घेतली जाते. दीपावली सुट्टी नंतर दुसरी निवड चाचणी घेऊन सरासरी गुणांच्या आधारे विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड केली जाते.

कार्यवाही :

या वर्षी इयत्ता चौथी साठी १७५ पेक्षा जास्त सरासरी गुण असणारे व इयत्ता सातवीसाठी १४० पेक्षा जास्त सरासरी गुण असणारे विद्यार्थी निवडले.
मार्गदर्शन वर्ग सुरु होण्यापूर्वी संबधित पालकांची सहविचार सभा घेऊन या उपक्रमाविषयी पालकांना माहिती दिली. त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा व जबाबदाऱ्या याविषयी चर्चा केली.
इयत्ता चौथीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन वर्ग बुध येथे व इयत्ता सातवीसाठी निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा मार्गदर्शन वर्ग राजापूर येथे सुरु केला.
मार्गदर्शन वर्गासाठी शिक्षकांची निवड त्यांच्याकडे असणारे कौशल्य, अभ्यास, व्यासंग व इच्छा याआधारे केली.
दिनांक २६ डिसेंबर पासून मार्गदर्शन वर्ग सुरु केला. सुरुवातीला १० दिवस अभ्यासक्रमाची उजळणी व पाठांतर इ. बाबींचे नियोजन व कार्यवाही केली. त्यानंतर आता दररोज तीन प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्तरपत्रिका तपासून लगेच त्यातील चुकांवर प्रत्येक विषयासाठी एक ते दीड तास सखोल मार्गदर्शन केले जाते. तसेच चुकलेले प्रश्नांसारखे प्रश्न शिक्षक स्वत: तयार करून विद्यार्थ्यांना सराव देतात. चुकलेल्या प्रश्नांचे वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या दररोजच्या गुणांचे संगणकीय विश्लेषण केले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा प्रत्येक आठवड्याला पालकांना दिला जातो. अशा प्रकारे ५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीमध्ये विविध प्रकाशनांच्या व शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या ६० ते ६५ प्रश्नपत्रिकांचा सराव घेणार आहोत. उरलेल्या कालावधीमध्ये गतसालाप्रमाणे राज्यातील तज्ञ मार्गदर्शक, विषयतज्ञ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ,  तसेच संगणकाच्या मदतीने काही घटकांचे अध्यापन केले जाणार आहे.
अशा प्रकारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बौद्धिक तसेच मानसिकदृष्ट्या तयार केला जातो. उपक्रम कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच विध्यार्थ्यांचा आहार, व्यायाम, आत्मविश्वास इत्यादी बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते.

शिष्यवृत्तीतील यश :


गत तीन वर्षापासून मा. विस्तार अधिकारी श्री. मिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शन व नियोजनाप्रमाणे सन २०११-१२ मध्ये इयत्ता चौथीचे ११ विद्यार्थी व इयत्ता सातवीचे ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. सन २०१२-१३ मध्ये अचूक नियोजन व नियोजनाची कार्यवाही, अनुभव इत्यादींचा फायदा होऊन इयत्ता चौथीचे २२ विद्यार्थी व इयत्ता सातवीचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.

वाटचाल :

आमचे मार्गदर्शक
श्री. गोसावी साहेब
मा. शिक्षणविस्तार अधिकारी, बीट बुध
या शैक्षणिक वर्षात शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गोसावी साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनाने  (Micro-Planning) आम्ही निश्चितपणे अर्धशतकी वाटचाल करू व राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवू असा विश्वास आम्हाला वाटतो.

No comments:

Post a Comment